
कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ–खोतवाडी मार्गावरील आयोध्या नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध सुगंधी तंबाखू (मावा) निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १९ लाख रुपयांचा कच्चा माल, रसायने, पॅकिंग साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून कारखान्याचा मालक व तीन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू तयार करून त्याची विक्री केली जात होती. छाप्यात मॅन्थॉल, ग्लिसरीन, विविध रसायने, सुगंधी तंबाखूचा कच्चा माल, पॅकिंग साहित्य तसेच उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
या प्रकरणी कारखान्याचे मालक विनायक मुठाणे तसेच कर्मचारी अविनाश कोळेकर, पुनाराम नाईक आणि गोपाल नाईक यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, विजय पाचपुते, शहापूर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
या धाडीनंतर परिसरात आणखी किती अवैध मावा कारखाने सुरू आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, हा कारखाना गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची चर्चा असताना प्रशासनाची कारवाई इतक्या उशिरा का झाली, याबाबतही नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
